सावधान! तुमच्या गाडीची ‘एक्स्ट्रा फिटिंग’ कुणाचा जीव तर घेत नाहीये? रस्ते अपघातात आता थेट ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा!”


मुक्ताईनगर:दि.5 रस्ते अपघातात निष्पाप जीवांचा बळी जाण्याच्या घटना नवीन नाहीत, मात्र अनेकदा हे अपघात ‘दैवदुर्विलास’ नसून मानवनिर्मित निष्काळजीपणामुळे घडलेले असतात. मुक्ताईनगर येथे नुकत्याच घडलेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी अंत झाला असून एकाला गंभीर दुखापत झाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी केवळ ‘अपघाताची’ नोंद न करता, एका कठोर कायदेशीर कारवाईचा पायंडा पाडला आहे

केळी वाहतूक करणाऱ्या एका आयशर गाडीला बेकायदेशीरपणे बाहेर काढलेल्या लोखंडी पट्ट्या (अँग्लर) लावण्यात आल्या होत्या. याच धारदार पट्ट्यांमुळे दुचाकीवरील कुटुंबाचा भीषण अपघात झाला. यात एका चिमुरडीने आपले आई-वडील गमावले आहेत.
पोलिसांचा ‘मास्टरस्ट्रोक’:
कलम १०५ (BNS) अन्वये कारवाईनेहमीच्या रस्ते अपघातात पोलीस कलम १०६ (निष्काळजीपणाने मृत्यू) अंतर्गत गुन्हा नोंदवतात, ज्यामध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. मात्र, या केसमध्ये मुक्ताईनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०५ (सदोष मनुष्यवध) लागू केले आहे.
वाहनधारकांनो, ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची:
कलम १०५ का? जर तुम्हाला माहित आहे की तुमच्या कृतीमुळे (उदा. गाडीला जीवघेण्या लोखंडी पट्ट्या लावणे) कुणाचा जीव जाऊ शकतो, तरीही तुम्ही ती कृती केली, तर तो ‘सदोष मनुष्यवध’ ठरतो.
कठोर शिक्षा: हा गुन्हा अजामीनपात्र असून यामध्ये जन्मठेप किंवा १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाची तरतूद आहे.गाडीला एक्स्ट्रा लोखंडी अँगल, रॉड किंवा धोकादायक फिटिंग लावणे आता तुम्हाला महागात पडू शकते.एक सकारात्मक पाऊल:
पोलिसांच्या या निर्णयामुळे विनापरवाना आणि धोकादायक पद्धतीने मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांमध्ये धडकी भरली आहे. रस्ते सुरक्षा म्हणजे केवळ हेल्मेट घालणे नव्हे, तर आपल्या वाहनामुळे दुसऱ्याला इजा होणार नाही याची काळजी घेणे, हा संदेश या निमित्ताने सर्वदूर जात आहे.आपली एक सतर्कता, वाचवू शकते कुणाचे तरी कुंकू आणि कुणाचे तरी आई-वडील!




