जळगाव दहीहंडी सोहळा: एल. के. फाउंडेशनच्या ७ थरी हंडीचे मानकरी ठरले ‘ श्रीकृष्ण मित्र मंडळ’


जळगाव दि.5 (धर्मेंद्र राजपूत) शहरातील एल. के. फाउंडेशन आयोजित सागर पार्क मैदानावर भव्य ‘राजेशाही दहीहंडी’ सोहळ्यात यंदा प्रचंड थरार पाहायला मिळाला. गोविंदा पथकांच्या तब्बल पावणे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री १०.४५ वाजता ७ थर लावून ही प्रतिष्ठेची दहीहंडी फोडण्यात आली. यंदा या मानाच्या दहीहंडीवर श्रीकृष्ण नगर मित्र मंडळाने आपले नाव कोरले. विजेता ठरलेल्या या मंडळाला आयोजकांकडून 51 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
सागर पार्क मैदान ‘गोविंदा रे गोपाला’च्या जयघोषाने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.लेझर शो आणि ढोल-ताशांचा जल्लोषया महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मैदानावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि लेझर शो होता, ज्याने उपस्थित जळगावकर नागरिकांचे डोळे दिपवून टाकले. ढोल-ताशांचा दणदणाट, रंगीबेरंगी आतषबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे यंदाचा सोहळा अधिकच देखणा झाला होता.
दिग्गजांची उपस्थिती
या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, एल. के. फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी महापौर ललित कोल्हे, नगरसेवक पीयुष कोल्हे, विष्णू भंगाळे, संतोष पाटील, प्रवीण कोल्हे, अरविंद देशमुख, रेश्मा काळे, उज्ज्वला बाविस्कर, सरिताताई माळी-कोल्हे, डॉ. केतकी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सादरीकरणानंतर उपस्थित श्रोत्यांनी आणि नागरिकांनी या ऐतिहासिक दहीहंडी उत्सवाचा मनसोक्त आनंद घेतला.




