नंदिनीबाई वामनराव मुलींच्या महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न


जळगाव/दि.3 (धर्मेंद्र राजपूत):नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक २ सप्टेंबर २०२६, बुधवार रोजी वांग्मय मंडळाच्या वतीने भव्य काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थिनींमधील सुप्त काव्यगुणांना आणि साहित्याची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विद्यार्थिनींनी विविध विषयांवर आधारित दर्जेदार कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे राहिला:
इयत्ता १२ वी गट:प्रथम क्रमांक: कुमारी लक्षणी खाचणेद्वितीय क्रमांक: कुमारी नम्रता राठोड
इयत्ता ११ वी गट:प्रथम क्रमांक: कुमारी हेमांगी योगेश्वर कोळी द्वितीय क्रमांक: कुमारी लीना रामदास भोळे
या विशेष प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती एस. एम. राणे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांनी विजेत्या व सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा. डी. यु. राठोड सर यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींना साहित्याचे जीवनातील महत्त्व पटवून दिले.स्पर्धेचे अचूक व निपक्षपातीपणे परीक्षण प्रा. आर. डी. वराडे सर आणि प्रा. एस. ए. चौधरी मॅडम यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वांग्मय मंडळ समिती प्रमुख प्रा. श्रीमती एस. डी. पाटील व प्रा. जे. व्ही. मोरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनींचे या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.




