खाकी वर्दीतील माणुसकी! जळगाव पोलिसांचा कडक उन्हात राबणाऱ्या हातांना मायेचा आधार


जळगाव:दि.9 (धर्मेंद्र राजपूत) खान्देशात सूर्याचा कोप सुरू असून तापमानाचा पारा जवळपास 44 अंशांच्या पार गेला आहे. अशा अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडणे टाळत असताना, पोटाची खळगी भरण्यासाठी काही कष्टकरी मात्र रस्त्याच्या कडेला बसून प्रामाणिकपणे आपला किरकोळ व्यवसाय करत आहेत. या कष्टकऱ्यांच्या घामाची दखल घेत जळगाव पोलीस दलाने माणुसकीचे दर्शन घडवले असून, २० निवडक गरजू विक्रेत्यांना मदतीचा हात दिला आहे.उन्हापासून संरक्षण आणि गारव्याची भेट जळगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्यावर ऊन-पावसात बसून विक्री करणाऱ्या २० विक्रेत्यांची अतिशय पारखून निवड करण्यात आली. या कष्टकऱ्यांचे काम थोडे सुसह्य व्हावे, या उद्देशाने त्यांना ट्रॅफिक ऑफिसमध्ये बोलावून उन्हापासून बचावासाठी मोठी छत्री आणि पिण्याचे पाणी थंड राहण्यासाठी मिल्टनची पाण्याची बॉटल भेट देण्यात आली.

‘अरे संसार संसार…’ कष्टकऱ्यांशी साधला संवादयावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांशी आपुलकीने संवाद साधला. कवी बहिणाबाई चौधरी यांच्या “अरे संसार संसार, कसा नाही गड्या मान? एका घासाला कागा, दुसरा सुके उभा प्राण!” या ओळींचा प्रत्यय यावेळी येत होता. संसाराचा गाडा ओढण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या या हातांना सन्मान मिळाल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते.
केवळ कायदा आणि सुव्यवस्था न राखता, समाजातील शेवटच्या घटकाप्रती असलेली आपली जबाबदारी जळगाव पोलिसांनी या निमित्ताने अधोरेखित केली आहे.पोलिसांच्या या ‘थंडावा’ देणाऱ्या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून, “खाकी वर्दीतही एक हळवं आणि मदतीचं मन असतं,” अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.




