जळगाव शहरात आता महिलांच्या सुरक्षेसाठी पुन्हा धावणार ‘दामिनी पथक’; पोलीस अधीक्षकांचा पुढाकार


जळगाव:दि.9 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव शहरातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘दामिनी पथक‘ गेल्या काही दिवसांपासून बंद होते. मात्र, महिला सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या पुढाकाराने हे पथक पुन्हा कार्यान्वित केले आहे. यामुळे शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पोलीस अधीक्षकांनी स्वतः दिल्या सूचना हे पथक अधिक सक्षमपणे कार्यरत व्हावे यासाठी पोलीस अधीक्षकांनी पथकात नियुक्त सर्व महिला अंमलदारांशी थेट संवाद साधला. कामाचे स्वरूप, अपेक्षित प्रतिसाद आणि महिलांना कशा प्रकारे मदत मिळवून देता येईल, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या पथकासाठी स्वतंत्र एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून, आता हे पथक शहरात पुन्हा ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

असे असेल दामिनी पथकाचे कामकाज:शाळा-कॉलेज परिसरात गस्त: शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी हे पथक सतत गस्त घालेल.दहा मिनिटांत प्रतिसाद: १०९१ या हेल्पलाईनवर तक्रार प्राप्त होताच, अवघ्या १० मिनिटांत पीडितेपर्यंत पोहोचण्याचा या पथकाचा मानस आहे.
केवळ गुन्हे नियंत्रणच नव्हे, तर विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि महिलांचे कायदेशीर हक्क यावर मार्गदर्शन केले जाईल.समुपदेशन आणि आधार: छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार किंवा कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना कायदेशीर मदतीसोबतच मानसिक आधार आणि समुपदेशनही दिले जाईल.समाजात विश्वासाचे वातावरणदामिनी पथक पुन्हा सुरू झाल्याने समाजकंटकांवर वचक बसेल आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. “पोलिस आमचे मित्र आहेत” हा विश्वास सार्थ ठरवत, महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जळगाव पोलिसांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.




