शेतीराज्य

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

ठिबकवरील असंख्य पिकांची शिवराज सिंह चौहान यांच्याकडून पाहणी

जळगाव, दि.१९ (धर्मेंद्र राजपूत) दि.19 फळे, फुले व भाजीपाला या पिकांबरोबरच भात, गहू, मका, सोयाबीन, तूर, कापूस आणि कडधान्ये व तेलबियांची पिके ठिबक संचाच्या सहाय्याने घेतल्यास उत्पादन व उत्पादकतेत प्रचंड वाढ होऊन भारत शेतीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होऊन प्रगत राष्ट्रांच्या यादीत कसा जाऊन बसेल हे विविध पिकांची जळगावच्या जैन हिल्सवरील प्रात्यक्षिके पाहून केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी समजून घेतले.

कृषिमंत्री चौहान यांनी गुरुवारी जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने जैन हिल्सवर आधुनिक तंत्रज्ञानाने फळबागा व अन्य जी विविध पिके प्रात्यक्षिक म्हणून उभी करण्यात आलेली आहेत त्यांची पाहणी केली. जैन इरिगेशन कंपनीचे चेअरमन अशोक जैन यांनी त्यांचे स्वागत केले. मागील वीस वर्षांपासून जैन हिल्सवर ठिबक संचाच्या आधाराने भाताचे पीक घेतले जाते आहे. ठिबकवर भाताचे पीक येऊच शकत नाही असा बहुसंख्य शेतकऱ्यांचा समज असून तसा प्रश्नही नामदार चौहान यांनी उपस्थित केला व या प्रयोगाबद्दल आश्चर्यही व्यक्त केले. मागील चौदा वर्षातील भाताच्या ठिबकवरील प्रयोगांची माहिती दिल्यानंतर प्रवाही व पाटाने दिलेल्या पाण्यापेक्षा ठिबकवरील भाताचे उत्पादन कितीतरी अधिक येऊन दाणा उत्तम पोसला जातो आणि पिकाची अनावश्यक वाढ रोखली जाऊन ते आडवे पडत नाही असे कंपनीच्या शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हां यापुढील काळात भात पिकविणाऱ्या राज्यांमध्ये ठिबक संचावर भात उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे आश्वासन ना. चौहान यांनी दिले.

भाताबरोबरच हळद, आले, जैन स्वीट ऑरेंज, डाळिंब, आंबा व जैन संत्रा यांची नवीन तंत्रज्ञानाचा व टिश्यूकल्चरचा वापर करून उत्तम, सकस, दर्जेदार रोगमुक्त व व्हायरस फ्री रोपे कलमे जैन इरिगेशन कंपनी कशी तयार करते याची कृषिमंत्र्यांनी पाहणी करून माहिती घेतली. ग्रीनहाऊसमध्ये वाढविलेल्या केळी बागेला समक्ष त्यांनी भेट देऊन यासंबंधीचा व्हिडीओही त्यांनी स्वतःच्या आवाजात व्हायरल केला.हवामान बदल आणि तापमान वाढीच्या संकटातून शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर बंदिस्त व नियंत्रित वातावरणात म्हणजे ग्रीनहाउस, पॉलिहाऊस, शेडनेटमध्ये क्लायमेट स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारची पिके कशी घेतली पाहिजेत यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. ‘सिक्स इन वन’ तंत्रज्ञान उष्ण वातावरणात ऊसासारख्या पिकाला कसे उपयोगी पडून उपादन वाढते हे देखील त्यांनी जैन हिल्सवर अनुभवले.

उष्ण व कोरड्या वातावरणात काळी मिरीचे पीक कसे सुंदर येते आणि हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग व क्लायमेट न्यूट्रल आलू टयूबर (बटाटा बियाणे) कसे तयार होते व शेतकऱ्यांसाठी ते कसे फायदेशीर ठरते याचे प्रात्यक्षिकही नामदार चौहान यांनी जैन हिल्सवर पाहिले.

या भेटीच्यावेळी ना.चौहान यांच्या समवेत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे (फलोद्यान) अतिरीक्त महासंचालक डॉ. बी. व्ही. पटेल, राज्याचे फलोद्यान संचालक अंकुश माने, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचे डॉ. विजय दोहरे, सहसचिव प्रियरंजन दास, जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. मंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेमध्ये जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन आणि डॉ. के. बी. पाटील, डॉ. बी.के. यादव, डॉ. अनिल ढाके, डॉ. अनिल पाटील व बी. डी. जडे यांनी भाग घेतला. कंपनीच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची यावेळी मंत्री महोदयांना माहिती देण्यात आली.

आधुनिक सिंचन तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, फ्युचर फार्मिंग आणि विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित शेतीची कास धरली तरच आपला देश प्रगतीच्या दिशेने जाऊ शकेल असा ठाम विश्वास ना. चौहान यांनी व्यक्त केला.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button