जळगावमध्ये विनापरवाना राहणाऱ्या बांगलादेशी महिलेसह आश्रयदात्यावर शनिपेठ पोलिसांची कारवाई


जळगाव:दि.11 शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सुरू केलेल्या “विशेष शोध मोहिमे” अंतर्गत शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना आणि अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिला आश्रय देणाऱ्या एका व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जोशी पेठ, भोई गल्ली भागात एक परदेशी महिला कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १० मे २०२६ रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी कोणीका राणी शामलचंद्र राय रा. बांगलादेश) ही महिला तेथे आढळून आली.घुसखोरी करून वास्तव्य केलेल्या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर महिलेने पासपोर्ट किंवा व्हिसा यांसारख्या कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सीमेत प्रवेश केला होता आणि ती जळगावात अनधिकृतपणे राहत होती.आश्रय देणाऱ्यावरही कारवाईया प्रकरणी केवळ महिलेवरच नव्हे, तर तिला आश्रय देणाऱ्या चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित महिला ही बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असूनही, चिन्मयने ती पोलिसांपासून लपवून ठेवली आणि तिला आश्रय दिला, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.या दोघांविरुद्ध इमिग्रेशन आणि परदेशी कायदा २०२५ च्या कलम २१, ०८ आणि २४ अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जळगाव शहर पोलिसांनी सुरू केलेल्या या विशेष मोहिमेमुळे अवैध नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.




