अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक साधतात पालकांशी संवाद


जळगाव, दि.२३ (धर्मेंद्र राजपूत) विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ असणे गरजेचे आहे. याच शैक्षणिक जाणिवेतून अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतन स्कूलने ‘पालकांशी थेट संवाद’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. “विद्यार्थ्याला समजून घेण्यासाठी केवळ वर्गातील निरीक्षण पुरेसे नाही; त्याचे घर, कुटुंब, दिनचर्या, सवयी आणि भावनिक जग समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने अनुभूती बालनिकेतनने Home Visit ही संकल्पना राबवली आहे.”

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळेतील वातावरणाइतकेच घरातील वातावरण महत्त्वाची भूमिका बजावते. बालवयात मुलांच्या मनावर चांगल्या संवाद, सवयी, वागणूक आणि विचारांचा मोठा प्रभाव पडतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या थेट घरी जाऊन पालकांशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन करण्याचा असा उपक्रम राबविणारी अनुभूती बालनिकेतन ही एकमेव स्कूल आहे. बालनिकेतन मॉन्टेसरीमधील ३ ते ६ वयोगटातील विद्यार्थी तर विद्यानिकेतन मधील इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांंसाठी हा उपक्रम मोलाचा ठरत आहे.
शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळविणे नव्हे, तर संवेदनशील, आत्मविश्वासू, शिस्तप्रिय आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व घडविणे या व्यापक संकल्पनेला या उपक्रमातून मूर्त रूप दिले जात आहे, असे प्राचार्य मनोज परमार यांनी सांगितले. त्यासाठी अनुभूती बालनिकेतन मॉन्टेसरीच्या अवनि जैन, किर्ती पगारिया, हिमानी बारी, सोनिया शर्मा, पंपा खारा या शिक्षिका पालकांपर्यंत पोहचवून चर्चा करित आहेत. या भेटीदरम्यान शिक्षक पालकांशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या भावनिक, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक विकास, समस्यांबाबत संवाद साधत आहेत. मुलांसमोर कोणत्या विषयांवर बोलावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, मुलांशी संवाद कसा साधावा, त्यांच्यासोबत कोणते खेळ खेळावेत, त्यांना कोणत्या चांगल्या सवयी व मूल्यांची ओळख कशी करून द्यावी, तसेच स्क्रीन टाईम, परिवारातील इतर सदस्यांसोबत मुलांचे नाते, याबाबत पालकांंना मार्गदर्शन केले जात आहे. मुलांना सतत सूचना देण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवणे, खेळणे, त्यांच्या प्रश्नांना समजून घेणे, त्यांच्या भावना ऐकून घेणे आणि योग्य-अयोग्य यातील फरक प्रेमाने समजावून सांगणे या बाबींवरही शिक्षिका पालकांशी संवाद साधत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास अधिक सक्षम होण्यास मदत होत आहे. या भेटीनंतर पालकांनी शाळेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

‘शाळा, घर, शिक्षक, पालक यांच्यातील दुवा अधिक मजबूत झाला, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल होईल, या विचारातून राबविण्यात येणारा हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरत असल्याची प्रतिक्रिया संचालिका सौ. निशा जैन यांनी दिली.
घर-शाळेच्या संवादातून बालकाचा सर्वांगीण विकास
‘पालकांशी थेट संवाद’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शाळेतील दैनंदिन दिनचर्या, अभ्यासाची सवय आणि खेळासाठी दिला जाणारा वेळ, विद्यार्थी स्वतःची कामे किती स्वतंत्रपणे करतो, अभ्यासाची जागा आणि त्यातील सहजता समजणे, घरगुती कामांमध्ये सहभाग व इतरांना मदत करण्याची सवय, विद्यार्थ्याच्या आहाराच्या सवयी, आवडी-निवडी आणि स्वतः जेवण्याची सवय, विद्यार्थ्याची झोप व दुपारच्या विश्रांतीची दिनचर्येसोबत मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनचा वापर किती आणि पालकांच्या देखरेखीखाली होतो का, यावर विश्लेषणात्मक चर्चा केली जाते.




