

जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या गाजलेल्या प्रकरणांपैकी एक असलेल्या ‘अटलांटा कन्स्ट्रक्शन’ प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या विशेष बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री यांनी जळगाव महापालिका आयुक्तांना या प्रकरणी तात्काळ सरकारी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लढाईत जळगावकरांना मोठा न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे

अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीने जळगाव महापालिकेत काम करताना आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी यापूर्वीच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, आता या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता थेट शासनस्तरावरून ठोस पावले उचलली गेली आहेत.मुंबईत ‘वर्षा’वर खलबते:या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, नंदू आडवाणी, मनोज काळे आणि तक्रारदार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अरविंद देशमुख यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बैठकीतूनच जळगावचे आयुक्त ज्ञानेश्वर ढोरे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि विनाविलंब कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
कारवाईचा मार्ग मोकळा:नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या वैयक्तिक तक्रारीनंतर आता महापालिका प्रशासन स्वतः ‘फिर्यादी’ बनून गुन्हा दाखल करणार असल्याने या तपासाला अधिकृत आणि कायदेशीर बळ मिळणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा गैरवापर आरोप यावेळी करण्यात आला तसेच दोषींवर आता काय करावे होणार याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.




