

जळगाव:दि.25 (धर्मेंद्र राजपूत ) जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी गुरुवार शहरातील अयोध्या नगर आणि ऑटो नगर परिसराची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी गटार तुंबल्याच्या तक्रारीवरून बांधकाम व आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
आयोध्या नगरमधील समस्यांवर तात्काळ उपाययोजनांचे आश्वासन

आयोध्या नगरमधील अशोक नगर परिसरातील गणपती मंदिर परिसरात सांडपाण्याच्या (गटारीच्या) गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीवरून महापौर दीपमाला काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी त्यांना परिसरातील गटारींच्या दुरावस्थेमुळे होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. यावर पालिका अधिकारी योगेश वाणी यांनी तांत्रिक बाबी स्पष्ट करत उपाययोजनांची माहिती दिली. महापौर काळे यांनी, पुढील आठवड्यापर्यंत नाल्याचे पाणी लोकांच्या घरात शिरू नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, प्रदीप रोटे आणि रंजना वानखेडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑटो नगरमध्ये अधिकाऱ्यांची झाडाझडती
ऑटो नगर परिसरात रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्यांच्या कामात होत असलेला विलंब आणि नियोजनाचा अभाव पाहून महापौर दीपमाला काळे यांनी अधिकार्यांना धारेवर धरले. “तुम्हाला व्यवस्थित नियोजन करून कामे करता येत नाहीत का?” असा प्रश्न करत, पीडब्ल्यूडी विभाग आणि महापालिकेचे इंजिनिअर्स यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
आरोग्य विभागाच्या कारभारावर नागरिक
या दौऱ्यात महिला नागरिकांनी स्वतःच्या घरासमोरील तुंबलेल्या गटारींची भीषण अवस्था प्रत्यक्ष दाखवून दिली. आरोग्य विभाग काम करत नसल्याच्या तक्रारी करत नागरिक आक्रमक झाले होते. नागरिकांची ही कैफियत आणि आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा पाहून महापौरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. गटारींची त्वरित साफसफाई करण्याचे कडक निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. महापौरांच्या या धावत्या दौऱ्यामुळे आणि अधिकार्यांना दिलेल्या स्पष्ट सूचनांमुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीत सुधारणा होईल का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.




