जळगाव महानगरपालिकेत आता ‘कर्मचारी संवाद व जनता दरबार’; उपमहापौर मनोज चौधरींचा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक पुढाकार


जळगाव:(धर्मेंद्र राजपूत) दि.15 महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. त्यांच्या पुढाकाराने महापालिकेत पहिल्यांदाच “कर्मचारी संवाद व जनता दरबार” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणार आहे.
थेट संवादातून सुटणार अडचणी
जळगांव महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले स्थायी (कायमस्वरूपी) आणि कंत्राटी कर्मचारी योग्य प्रकारे कामे करतात तर त्यांना अनेकदा आपल्या सेवाविषयक अडचणी किंवा कामकाजातील समस्या मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन उपमहापौर मनोज चौधरी यांनी या ‘जनता दरबारा’चे नियोजन केले आहे. याद्वारे कर्मचारी आपली गाऱ्हाणी, सूचना आणि मागण्या थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडू शकतील.
न्याय्य निर्णयासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा
या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ तक्रारी ऐकणे नसून, जनतेचे प्रश्न मार्गी लागावे त्याचप्रमाणे शहराला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढणे हा आहे. कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभाग आणि प्रशासकीय स्तरावर तातडीने पाठपुरावा केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांना न्याय मिळावा आणि कामकाजात पारदर्शकता यावी, यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन संयुक्तपणे काम करणार आहेत.
सहभागाचे आवाहन
कर्मचारी संवाद: जनता दरबार
दिनांक : 16/03/2026 , सोमवार
वेळ : सकाळी 10:00 ते 11:00
स्थळ : मनपा सभागृह, दुसरा माळा
महानगरपालिकेच्या सर्व विभागांतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तरी आपल्यातील ज्या कर्मचाऱ्यांना शक्य असेल त्यांनी वेळ काढून कामाचे नियोजन करून कर्मचाऱ्यांना आपल्या समस्या किंवा सूचना मांडायच्या आहेत, त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत आणाव्यात. या उपक्रमामुळे महापालिकेच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे- मनोज चौधरी,उपमहापौर




