मधमाशी पालन विषयावर जनजागृती, शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे


जळगाव दि. 15 (धर्मेंद्र राजपूत) : शेतीमध्ये परागीभवनासाठी मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले. फळबाग, भाजीपाला व तेलबिया पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी मधमाश्या अत्यंत उपयुक्त ठरतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. असे पुणे येथील संचालक, इंडियन नॅचरल हनीबीज चे संजय मारणे यांनी मधमाश्यांचे विविध प्रकार, त्यांचे उत्पादने (By-products), बी व्हेनम (Bee Venom), परागीभवनाचे महत्त्व तसेच शेतीसाठी मधमाशी पालन कसे उपयुक्त आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधमाशी पालन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकूण ४० सहभागी उपस्थित होते.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी यवतमाळ कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रदीप वादाफळे, अमरावती चे दिगंबर भुयार, नाशिक चे विजय चोंडेकर, सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक पी. टी. पाटील, जामनेरचे प्रगतीशील शेतकरी एस आर पाटील, जैन इरिगेशन कृषी विभागाचे संजय सोन्नजे, एनर्जी पार्क सीएसओ दिपक चौधरी, गांधी रिसर्च फाऊंडेशन सुधीर पाटील, लक्ष्मण देशमुख, जैन इरिगेशन वन वन्यजीव पर्यावरण विभागाचे सल्लागाराचे राजेंद्र राणे उपस्थित होते.
मधमाश्यांचे प्रमुख प्रकार जसे की एपिस सेरेना इंडिका (Apis cerana indica), एपिस मेलिफेरा (Apis mellifera), एपिस डॉर्साटा (Apis dorsata), एपिस फ्लोरिया (Apis florea) तसेच डंखरहित मधमाश्या (Stingless Bees) यांची माहिती देण्यात आली. एपिस डॉर्साटा (Rock Bee) या मोठ्या आकाराच्या मधमाश्या असून त्या उंच झाडे व इमारतींवर उघड्यावर पोळे बांधतात. त्यांचे मध उत्पादन जास्त असते, परंतु त्यांचे नियंत्रित व्यवस्थापन करणे कठीण असते. एपिस फ्लोरिया (Little Bee) या लहान आकाराच्या मधमाश्या असून त्या झुडपांवर किंवा लहान फांद्यांवर पोळे बांधतात. त्यांचे मध उत्पादन कमी असले तरी परागीभवनात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. तसेच मधमाश्यांपासून मिळणारी उपउत्पादने जसे की मध, मेण (Beeswax), परागकण (Pollen), रॉयल जेली, प्रोपोलिस आणि बी व्हेनम (Bee Venom) यांचे औषधी व आर्थिक महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
शेतीमध्ये परागीभवनासाठी मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले. फळबाग, भाजीपाला व तेलबिया पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी मधमाश्या अत्यंत उपयुक्त ठरतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. “No Bees – No Food” ही संकल्पना स्पष्ट करत पर्यावरण संतुलनात मधमाश्यांची भूमिका विशद करण्यात आली.

मधमाशी पालनाची देखभाल (Maintenance), बॉक्स व्यवस्थापन, राणी मधमाशीचे महत्त्व, रोग नियंत्रण, हंगामी काळजी आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालन कसे फायदेशीर ठरते यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ४० सहभागींकडून मधमाशी संरक्षणाची शपथ (Oath) घेण्यात आली. सहभागीनी पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा केली –
“मी मधमाश्यांचे संरक्षण करीन, पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देईन, कीटकनाशकांचा योग्य व मर्यादित वापर करीन आणि ‘No Bees – No Food’ हा संदेश समाजात पोहोचवीन.” उपस्थितांनी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार राजेंद्र राणे यांनी केले.




